श्रीरामपूर-
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीच काम करत नाही. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न असतात. जातीविरहित, पक्षविरहित काम होणे हा आमचा प्राधान्यक्रम असतो.विखे पाटील परिवार ‘माणुसकी’ म्हणून शिर्डी-राहाता मतदारसंघात अनेक वर्ष काम करीत आहे.हीच माणुसकी शेवटपर्यंत टिकली पाहिजे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राहाता तालुका कृषी विभाग, पंचायत समिती उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लाभार्थी प्रमाणपत्र वाटप, फूड प्रोसेसिंग व पापड युनिट उद्घाटन, महिला बचत गटांना कर्जवाटप, ‘लखपती दीदी’ प्रमाणपत्र वितरण, राहाता नगरपरिषद एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत घरकुल वाटप तसेच राहाता मंडळ नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा घोलप मंगल कार्यालय, राहाता येथे पार पडला. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, मुकुंद सदाफळ, सोपान सदाफळ, कैलास सदाफळ, संजय सदाफळ, नितीन कापसे, भाऊसाहेब जेजुरकर, राजू दमसे, दिलीप गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. विखे पाटील बोलत होते.

डॉ. विखे म्हणाले,ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना जनतेने दिलेलं प्रत्येक मत हे अतिशय अमूल्य आहे.पाच वर्ष आपण सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी तडफड करतो, कार्यकर्ते धावपळ करतात. 2024 ची विधानसभा निवडणूक विखे पाटील परिवारासाठी सर्वात वाईट काळ ठरली. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांनाही पराभव पचवावा लागला.हा पराभव झाल्यानंतर तालुक्यातील काही ठराविक लोकांनी ठरवलं की, कोणत्याही परिस्थितीत विखे पाटील परिवाराला या तालुक्यातून हद्दपार करायचं आहे. बैठका झाल्या, अनेक रणनित्या आखल्या गेल्या. अनेक जण दिवसा सोबत दिसायचे, पण रात्री त्यांच्या बैठकीत बसायचे. कोण कोणाचं, कोण कोणा बरोबर, कोण खरं-कोण खोटं – हे काहीच कळत नव्हत पण सामान्य माणसाचे आशीर्वाद आमच्या सोबत होते.

राहाता तालुक्यातील गुन्हेगारी हद्दपार करणार
डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढील पाच वर्षांत राहाता तालुक्यातील प्रत्येक कोपरा पाण्यापासून वंचित राहणार नाही आणि तालुका गुन्हेगारीमुक्त करणे हा ठाम संकल्प आहे. मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही.गरज भासल्यास कायदा हातात घेऊनही महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जातील. “असा दिवस आणू की, मुलगी रात्री उशिरा घरी आली तरी पालक निर्धास्त राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.