श्रीरामपूर-
कर्जमाफीसाठी सरकारने काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या वेळची कर्जमाफी आज पर्यंतच्या सर्व कर्जमाफ्यांमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली व खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी किसान सभेने या आदेशाची राज्यभर होळी करण्याची हाक दिली होती.अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे यानुसार अध्यादेशाची होळी करण्यात आली. उद्या व परवा सलग दोन दिवस राज्यभर हे होळी आंदोलन सुरू राहणार आहे.सरकारने कर्जमाफी करताना, 2019 मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी, जरी ते यावेळी थकित असले तरी त्यांना केवळ 50 हजार रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यांनाही किमान दोन वर्ष नियमित कर्जदार असणे ही अट टाकण्यात आली आहे. अत्यल्प पगारावर राबणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन द्यायचे आणि आता 2 लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50 हजारावर बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. शेतकऱ्यांच्या या फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून तो राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
अकोले येथे झालेल्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.अकोले शहरातील महत्मा फुले चौकात फसव्या कर्जमाफी अध्यादेशाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी रद्द करा. सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या. नियमित कर्जदार शेतकरी, शेड नेट, पॉली हाऊस शेतकरी, कुक्कुट पालन शेतकरी यांच्यासह सर्व पीक व शेती सुधारणा कर्ज माफ करा या मागण्या यावेळी करण्यात आल्या.आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड सदशिव साबळे, गणेश ताजणे, लक्ष्मण घोडे, बाळासाहेब मधे, संगिता साळवे, हेमलता शेळके, दत्ता कोंडार, दिलिप हिंदोळे, आप्पा घोडे, वामन मधे यांनी केले.
