श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे झालेल्या हिंदु मातंग समाजाच्या निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणाऱ्या आरोपींना महिना उलटूनही अटक न झाल्याने आरोपींना अटक करण्याची मागणी करत शनिवारी दुपारी शहरात भव्य मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मातंग समाज बांधव तसेच हिंदू समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.
श्रीरामपूर शहरातील भगतसिंग चौकातून या मोर्चाला दुपारी सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवतीर्थ येथे आला. शिवतीर्था समोर विराट मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन तेथे शिवप्रहार प्रतिष्ठान प्रमुख सुरजभाई आगे, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदू मातंग बंधू निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवुन हत्या करणारे वाळू तस्कर व त्यांचे साथीदार इतर आरोपींच्या अटकेची मागणी करत फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच हत्या करणाऱ्या वाळू तस्कर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व पाठबळ देणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्यालाही आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी मयत निलेश शेंडगे यांच्या मुलीने भावना व्यक्त करत आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली.यावेळी भावना व्यक्त करताना मुलगी भावुक झाल्याने यावेळी महिलांचेही अश्रू अनावर झाले होते.सभेनंतर हजारो मोर्चेकरांच्या उपस्थितीत पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हेही उपस्थित होते.
