श्रीरामपूर-
आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. त्याच्या अनुषंगाने ३४ जणांविरुद्ध हद्दपारी प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हयात सराईत गुन्हे करणा-या व्यक्ती टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्दपारीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच यापुढेही अशा प्रकारच्या गुन्हेगार व्यक्ती / टोळीची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु असुन त्यांचे विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाया करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले आहे.त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ मध्ये श्रीरामपुर विभागातील (अहिल्यानगर उत्तर जिल्हा) १७ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील मागील १० वर्षांतील (२०१६ ते २०२५) सर्व गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राईम डेटाबेस’ तयार केला आहे.
समाजात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५, ५६ तसेच नवीन फौजदारी कायदयाचे तरतुदी नुसार गुन्हेगारांवर अधिक कडक आणि जलद कारवाई केली जात आहे. क्राईम डेटाबेसमुळे तपासाची गती वाढणार असून, कोणताही आरोपी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकणार नाही. नवीन कायद्यांमधील तरतुदींचा प्रभावी वापर करून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी हा डेटाबेस ‘कणा’ ठरणार आहे. सदरचा Crime Data हा केवळ एका पोलीस स्टेशन पुरता नसुन पुर्ण अहिल्यानगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचा गुन्हे रेकॉर्ड यात संकलित केला आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्याचेवर तात्काळ प्रतिबंधक कारवाई करणे शक्य होणार आहे.
