श्रीरामपूर-
‘इथे जमिन विकत घ्यायची नाही’ असे म्हणत एका जणावर गावठी कट्टा रोखत सुमारे नऊ ते दहा जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना नायगाव ता.श्रीरामपूर येथे दि.11 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली.याप्रकरणी चेतन पेत्रस खाजेकर,रा.श्रीरामपूर याने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन दाभाडे रा.गोंधवणी,श्रीरामपुर याच्यासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान या मारहाणीच्या घटनेतील बेपत्ता निलेश शेंडगे यांचा मृतदेह आज गोदावरी नदीपात्रात मिळून आला आहे.पोलीसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदनानंतर पुढील तपास प्रक्रिया केली जाणार आहे.
याबाबत चेतन पेत्रस खाजेकर, वय 23 वर्षे,धंदा डिजे ऑपरेटर रा.बेलापुर रोड वार्ड नं 07,श्रीरामपुर ता. श्रीरामपुर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,मी आमच्या गल्लीत राहणारे चंद्रशेखर मनोज आगे यांना ओळखतो. त्यांचे नातेवाईक हे नायगाव येथे राहणारे असुन त्यांची जमिन विक्रीला असल्याने ती माझे नेवासा येथील मामा निलेश एकनाथ शेंडगे यांचा शिर्डी येथील मित्र निलेश दिपक जाधव यांना ती घेण्याच्या उद्देशाने दि. 25/12/2025 रोजी दुपारी 12:00 वा.चे सुमारास मी, अमित परशुराम कुटे रा.शिर्डी,निलेश एकनाथ शेंडगे, चंद्रशेखर आगे असे आम्ही नायगाव येथे सदरची जमीन पाहण्यासाठी तेथे गेलो होतो. जमीन पाहून झाल्यानंतर चंदु आगे त्याठिकाणावरुन निघुन गेले.त्यानंतर आम्ही सदर ठिकाणीवरुन निघुन जात असताना तेथे 3 ते 4 अनोळखी इसम तेथे आले.त्यांनी निलेश जाधव यांना येथे जमीन घेवु नका असे म्हणत शिवीगाळ केली व तेथुन काढून दिले.याबाबत चंदू आगे यांना मी सांगितले.त्यांनंतर दि.11/01/2026 रोजी मी,निलेश दिपक जाधव व त्यांचे सोबत अमित परशुराम कुटे,निलेश एकनाथ शेंडगे व त्यांच्यासोबत शंकर उमाप असे साधारण दुपारी 04/00 वा.च्या सुमारास नायगाव येथे पोहोचलो.आम्ही चंद्रेशेखर आगे यांची अर्धा ते पाऊण तास वाट पाहत थांबलो. चंद्रशेखर आगे हे तिथे आले नाही. त्यानंतर तेथे अर्जुन दाभाडे, राहुल धुमाळ, सागर भोसले, विजु पवार, असिफ कैची, अकिल बिल्डर, मयुर शिर्के, राहुल चव्हाण, मेजर राणा व इतर 5 ते 6 जण असे त्यांच्या गाडीमधुन तिथे आले.त्यानंतर अर्जुन दाभाडे याने ‘तुम्हाला सांगितले ना इथे जमिन घ्यायची नाही’ असे म्हणुन त्याने त्याच्याकडील गावठी कट्यासदृश्य हत्यार निलेश जाधव याचे दिशेने रोखले.सागर भोसले व राहुल धुमाळ याने त्याचेकडे असणाऱ्या लाकडी दांडक्याने व विजु पवार, अकिल बिल्डर व आसिफ कैची यांनी लाथाबुक्याने अमित कुटे व शंकर उमाप यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर निलेश जाधव यास वाचवण्यासाठी निलेश शेंडगे हा गेला असता त्यास अर्जुन दाभाडे याने त्याचेकडील लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यांनतर मेजर राणा याने त्याच्या हातातील गावठी कट्यासारख्या वस्तुच्या मागील बाजूने माझ्या उजव्या डोळ्याजवळ मारून माझे गळयातील 7 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन घेतली. मयुर शिर्के, राहुल चव्हाण यांनीही मला लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर मी घाबरून तेथुन पळून गेलो. तसेच बाकी इतर लोकही आमच्याकडील गाड्या तेथेच सोडुन तेथून पळून गेले. परंतु माझा मामा निलेश शेंडगे हा नंतर आम्हाला मिळून आला नाही,असे या फिर्यादीत म्हटले आहे.यावरून श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आरोपी अर्जुन दाभाडे रा.गोंधवणी, श्रीरामपुर,सागर भोसले,राहल धुमाळ,मेजर राणा,विजु पवार,अकिल बिल्डर,मयुर शिर्के, राहुल चव्हाण,आसिफ कैची यांसह इतर 5 ते 6 जणांविरुद्ध भा न्या सं कलम 351(3(2),352,115(2),119(1),118(1),191(3),(2),190,189(2),(1) अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.मारहाणीतील निलेश शेंडगे याचा मृतदेह आज गोदावरी नदीत मिळून आल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.श्रीरामपूर तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.
