श्रीरामपूर-
बंटी जहागीरदार यांचा पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नाही.जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये जहागीरदार यांच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे नोंदवले आहे.जहागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून सर्वत्र जाणिवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत
केला.
ते पुढे म्हणाले की,पुण्यातील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० मध्ये बॉम्बस्फोट झाले होते.या प्रकरणामध्ये मिर्झा बेग,मोहसीन चौधरी,यासीन भटकल,रियाज भटकल, इकबाल भटकल,फय्याज कागझी आणि जैबुद्दीन अन्सारी हे सात आरोपी होते.असे असताना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये बंटी जहागीरदार यांचे नाव पूर्णतः बदनामीच्या उद्देशाने गोवण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या आपल्या आदेशामध्ये या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये बंटी जहागीरदार विरुद्ध कोणतेही सबळ पुरावे प्रथमदर्शनी दिसून येत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.असे असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस दलाच्या एका कार्यक्रमामध्ये बंटी जहागीरदार यांना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हटले आहे.त्यांचे हे म्हणणे चुकीच्या माहितीवर आधारित आहे. माध्यमांमध्येही बंटी जहागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून संबोधले गेले.वास्तविक हे कायदेशीर आणि मानवतेच्या दृष्टीने चुकीचे आहे,असे रईस जहागीरदार यांनी म्हटले आहे.बंटी जहागीरदार यांच्या हत्या प्रकरणात सागर उर्फ चन्या बेग,आकाश उर्फ टिप्या बेग, सोनू उर्फ जयप्रकाश बेग हेच मुख्य सूत्रधार आहेत,असा आरोपही रईस जहागीरदार यांनी केला आहे. बेग बंधूंवर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याचा तपशीलही त्यांनी दिला.या तिघांवर संगमनेर येथील एका अल्पवयीन हिंदू मुलीच्या अत्याचाराचा गुन्हा (केस नंबर 52/2014, ता. 20/08/2014) दाखल आहे. त्या प्रकरणात संगमनेर सत्र न्यायालयात वरील तीनही आरोपीविरुद्ध वॉरंट बजावलेला आहे. असे असताना पोलिस या तीनही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करत नाही. उलटपक्षी तीनही आरोपी श्रीरामपूरमध्ये खुलेआमपणे वावरत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला उपस्थित राहत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुका लढवत आहेत.कोर्टाने त्यांना फरार घोषित करण्याची कारवाई सुरू केलेली आहे.पोलिस यंत्रणेचे बेग बंधूंना असलेले आशीर्वाद पाहता बंटी जहागीरदार यांच्या हत्या प्रकरणात सागर उर्फ चन्या बेग, आकाश उर्फ टिप्या बेग, सोनू उर्फ जयप्रकाश बेग यांच्याविरुद्ध पोलिस यंत्रणा कारवाई करतील याविषयी आम्हाला मोठी शंका आहे,असेही रईस जहागीरदार यांनी म्हटले आहे.
या हत्येबाबत तपासामध्ये कोणतीही प्रगती अद्याप दिसत नाही.पोलिसांवर बाह्य शक्तींचा प्रचंड दबाव असल्याचे दिसून येत आहे. हत्येसाठी वापरलेले हत्यार अद्याप जप्त नाही. दुचाकी जप्त नाही. जे मुख्य सूत्रधार आहे त्यांच्यावर एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १३ गुन्हे एकट्या श्रीरामपूर पोलीस स्टेशनला दाखल आहेत.एमपीडीए चा गुन्हा काढून टाकून ते राजकारण करीत आहेत.या गुन्ह्याशी संबंधित त्यांच्या फायली जाळण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक मुझफ्फर शेख यांनी यावेळी केला.या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा अशी मागणी आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रकरणी दाद मागण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, पालकमंत्र्यांनाही भेटू. तसेच पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जिल्हाभर आंदोलन उभे करण्यात येईल असेही शेख यांनी सांगितले.
