श्रीरामपूर-
पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीच्या श्रीरामपूर येथे झालेल्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात.देशद्रोही कारवाया करणाऱ्याच्या समर्थनार्थ होणारी ही गर्दी चिंताजनक आहे.हजारो निरपराध लोक त्या बॉम्बस्फोटात मारले गेले.त्या आरोपीच्या अंत्यविधीला जमलेली गर्दी पहिल्यावर हा देश कोणत्या दिशेला चाललाय असा प्रश्न पडतो,असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या २८ चार चाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले,त्या अंत्यविधीला आलेल्या लोकांची व्हिडीओग्राफी पोलिसांनी करायला हवी होती.श्रीरामपूर हा गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे. नेवशाची तीच अवस्था आहे. गुन्हेगार राजरोसपणे कट्टे घेऊन मोकाट फिरतात.दुर्दैवाने काही पक्षांची मंडळी त्यांचे मतांच्या राजकारणाकरता लांगूलचालन करतात. परंतु पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याचे काम करावे.आपण त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व निधी जिल्हा नियोजन मधून देऊ असे आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले.
गुटखा व अवैध व्यवसायातून येणारा पैसा गुन्हेगारीला बळ देत असून, जिल्ह्यात वाढलेला अमली पदार्थांचा विळखा व बेकायदेशीर शस्त्रांचा वावर रोखणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपीं पर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता किंवा उपोषणा सारख्या बाबींना न घाबरता, सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई झालीच पाहिजे.गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारून जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून, गुन्हेगार अद्ययावत शस्त्रांचा व इंटरनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे.
शासनाचा भर केवळ वाहने देण्यावर नसून पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानांचा प्रश्न सोडविण्यावरही आहे. अहिल्यानगर शहरात ३२२ कोटी रुपये खर्चाच्या पोलीस निवासस्थान संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, सायबर गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असून, उपविभागीय स्तरावरही अत्याधुनिक ‘कमांड सेंटर’ उभारणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास मदतीसाठी या नवीन वाहनांचा मोठा उपयोग होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यात मुंबई (२८,०००) वगळता राज्यात सर्वाधिक, म्हणजे वर्षाला सुमारे १७,००० गुन्हे घडतात. हे प्रमाण पुणे व नागपूर शहरांपेक्षाही अधिक आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार व शिर्डी, शनिशिंगणापूर सारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील. विशेषतः महिलांची सुरक्षितता व ‘११२’ क्रमांकावर येणाऱ्या आपत्कालीन कॉल्सना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या वाहनांमुळे मदत होईल. ‘महाराष्ट्र पोलीस स्थापना दिना’निमित्त पोलीस दल जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.”जिल्ह्यात कोपरगाव व पाथर्डी येथील नवीन पोलीस ठाण्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून राहाता, नेवासा व राहुरी येथील कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच श्रीगोंदा व श्रीरामपूर येथील कामांना गती मिळाली असल्याने पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे, असेही श्री. घार्गे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे आदी उपस्थित होते.
