श्रीरामपूर-
भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विहिरी व बोअरचा उपसा सिंचनासाठी होत असल्याने भुजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी दोन आवर्तनांचे नियोजन करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले की,आवर्तन कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांकडून नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज कालवा निरीक्षकांनी भरून घेण्यासाठी विभागाने सूचना कराव्यात.जलसंपदा विभागाने थकबाकी अभावी कुठल्याही शेतकऱ्यांचे पाणी अर्ज नाकारू नयेत.यावर्षी खरीपामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे तसेच भंडारदरा सिंचन प्रणाली कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पिके नुकसानीमुळे बाधित झालेले आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील कॅनॉलच्या चाऱ्यांच्या परिसरातील पाणी पातळी खालावली आहे. मध्यंतरी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन तीन तीन दिवस पिण्याचे आवर्तने घेतल्यामुळे कॅनॉलच्या परिसरातील पाण्याची परिस्थिती पंधरा-वीस दिवस पुढे ढकलण्यासारखी असली तरी कॅनॉल पासून अंतरावर असलेल्या भागांमध्ये पाणी पातळी खालवली आहे.आज रोजी धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा असून पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून तात्काळ आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत असल्याचे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी म्हटले आहे.
