श्रीरामपूर-
बेलापूर ते लासूर स्टेशन हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून छत्रपती संभाजीनगरला अहिल्यानगरमार्गे पुण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
बेलापूर येथील रेल्वे अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे विभागाने नाशिक पुणे-अहिल्यानगर शिर्डी मार्गे रेल्वेमार्ग लोकसभा अधिवेशनात घोषित केला. हा मार्ग अतिशय योग्य असून चाकण ते शिरुर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा यात जोडला जाणार आहे. या मार्गामध्ये छत्रपती संभाजीनगर मनमाड रेल्वेमार्गावरील एक व्यापारी पेठ असलेल्या लासूर स्टेशन ते बेलापूर हा साधारण ५० किलोमीटरचा नवीन रेल्वेमार्ग सुरु केला. तर महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील महत्वाचे औद्योगिक शहर व आंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन केंद्र असलेले छत्रपती संभाजीनगर, शहर पुणे तसेच कुंभमेळ्याचे तीर्थक्षेत्र नाशिक ही तिन्ही शहरे एकमेकांना रेल्वेने जोडली जातील.
हा बेलापूर स्टेशन (श्रीरामपूर) ते लासूर स्टेशन लोहमार्ग साधारण ५० किलोमीटरचा असून पैकी ५ किलोमीटर पर्यंत ब्रिटिश कालीन साखर कारखाना बेलापूर शुगर कंपनी पर्यंत रेल्वेमार्ग अस्तित्वात आहे. त्याची फक्त डागडुजी करण्याची करण्याची गरज आहे. या ५ किमी लोहमार्गाचे भूमी अधिग्रहण ही झालेले असून हा रेल्वे मार्ग आपण केल्यास या परिसरातील विकासाला मोठ्याप्रमाणावर चालना मिळेल म्हणून या नगर शिर्डी नाशिक लोहमार्ग करताना बेलापूर स्टेशन ते लासूरस्टेशन या विस्तारित मार्गाची उभारणी करावी.
बेलापूर स्टेशन म्हणजेच श्रीरामपूर शहर हा अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतरचे नवीन जिल्हा मुख्यालय असणार आहे. तसेच बेलापूर रेल्वेस्टेशनकडे मोठी जागा ब्रिटिशांनी अधिग्रहित केलेली आहे. त्यामुळे नवीन भूमी अधिग्रहण करण्याची गरज नाही. तसेच चांदेगाव-नागमठाण येथे गोदावरी नदीचे पात्र खडकाळ असल्याने तेथे रेल्वे पुलासाठी योग्य जागाही उपलब्ध आहे. असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले, संतोष जाधव, भरत रामकृष्ण आसने, दत्तात्रय लिप्टे, कॉ. गोविंदराव वाबळे, संदीप गवारे दिलीप गलांडे, किरण ताके, अॅड. प्रमोद बिहाणी, निखिल राजेंद्र, प्रविण चव्हाण, पंकज चव्हाण, अर्जुन साबणे, गणेश ठोंबरे, अनिल रोकडे, अजय गाडेकर, संजय भनगडे, रामदास वाकीर, सुभाष गायकवाड, जयेश निकम आदींच्या सह्या आहेत.
