श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस शिवसेना शिंदे गटासाठी अत्यंत धक्कादायक ठरला. प्रभाग १७ मधून अधिकृत उमेदवार प्रमोद कुऱ्हे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक माघार घेतली.तर प्रभाग ८-अ मध्ये पक्षाला एकही उमेदवार उभा करता आलेला नाही.
या दोन घटनांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणूक समीकरणे बदलली आहेत.दरम्यान शिवसेना पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक प्रचार सुरळीत सुरू असतानाच प्रभाग १७ मधील उमेदवार प्रमोद कुर्हे यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेतृत्व दोन्ही गोंधळून गेले आहे. आंतरकलह, दबावाचे राजकारण आणि स्थानिक जातीय व राजकीय गुंतागुंतीमुळे ही माघार घ्यावी लागल्याच्या चर्चा आहेत.मात्र पक्षाच्या वतीने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
याहून मोठा धक्का म्हणजे प्रभाग ८-अ मध्ये शिवसेनेला उमेदवारच मिळालेला नाही. वारंवार चर्चा, तडजोडी आणि बैठका झाल्या तरी कोणताही मजबूत चेहरा पुढे आला नाही. या घडामोडींमुळे विरोधकांचे पारडे अचानक जड झाले असून, स्वतंत्र उमेदवारांनाही प्रचंड फायदा होण्याची शक्यता वाढली आहे. शहरात प्रभाग १७ मधील माघार आणि प्रभाग ८-अ मधील रिक्त जागा या दोन्ही घटनांनी शिंदे गटाचे संपूर्ण गणित ढवळून निघाले आहे. आगामी काही दिवसांत श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
