श्रीरामपूर –
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर परिसरात भामाठान-खानापूर रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग तीन दिवस तीन बिबटे अडकले आहेत.त्यामुळे परिसरातील शेतकरी व शाळकरी मुलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरलेली होती.शेतकऱ्यांना शेतात दिवसा काम करणे देखील कठीण होऊन बसले होते. दुधाळ जनावरांना चारा आणण्यासाठी दररोज शेतात जाताना महिला वर्गही घाबरत होता.खानापूर शिवारात भामाठाण रस्त्यावर शाळकरी मुलांना रस्त्यावरून तीन बिबटे जाताना दिसले होते. त्यामुळे धास्तावलेल्या आजूबाजुच्या वस्त्यावरील शेतकऱ्यांनी ही वार्ता पशुवैद्यकीय डॉ. दादासाहेब आदिक यांच्या कानावर घातली त्यांनी वनरक्षक राहुल कानडे यांच्याशी संपर्क साधला. वन विभागाच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे पिंजरा एका स्पॉटवर आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या वाहनातून पिंजरा घेऊन जावा लागेल, असे सांगण्यात आले. खानापूरच्या तरूणांनी टॅक्टर ट्रॉलीमधून बोरावके फार्म ब्राम्हणगाव शिवार येथून पिंजरा आणला व पिंजरा बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात लावण्यात आला. भाऊसाहेब जोर्वेकर यांनी बिबट्या ला भक्ष्य म्हणून आपला बोकड आणून पिंजऱ्यात ठेवला.अखेर शनिवार दि. १८ रोजी पहाटे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पिंजरा जागेवर ठेवून दुसऱ्या पिंजऱ्यात बिबट्यास नेले. दुसऱ्या दिवशी रविवारी दि. १९ रोजी पहाटे पुन्हा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान खानापूरसह गोदावरी नदीच्या काठावरील दोन्हीही बाजूच्या गावांत अलीकडच्या काळात बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

