श्रीरामपूर-
राहत्यासह तालुक्यातील कोल्हार,लोणी आणि पंचक्रोशी भागात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष करून बाधित गावांची पाहाणी केली. कोल्हारमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील थेट मोटरसायकलवरून पूरग्रस्त परिसरात पोहोचले. परिस्थितीची थेट पाहणी करण्याची त्यांची पद्धत सर्वांना भावली आणि नुकसानग्रस्त नागरिकांना काहीसा आधार मिळाला.यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून आवश्यक ती मदत देण्याचे आदेश दिले.
राहाता तालुक्यात केवळ एका रात्रीत २०० मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारी संध्याकाळपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने ग्रामीण आणि शहरी भाग पाण्याखाली गेला. शेतजमिनी तसेच नागरी वसाहतींमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.कोल्हार परिसरात पाहणीदरम्यान पाणी नालींमध्ये अडकून राहिल्याचे कारण अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालकमंत्री विखे पाटील यांनी तातडीने नाले व प्रवाह अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिले.पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले. प्रशासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या तर स्थानिक युवकांनी कुटुंबांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.लोणी बुद्रुक, पाथरे आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधून तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
