श्रीरामपूर-
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून
त्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे यांना वगळण्यात यावे अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.
दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या माळेवाडी शाखेने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीसह गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून त्यामधून विदेशी गोवंश व भाकड जनावरे वगळावी यासाठी माळेवाडी येथील तलाठी कार्यालयावर मोर्चा नेला. सदर मोर्चे प्रसंगी मौजे माळवाडी येथील ग्राम महसूल अधिकारी सौ. सरगये नावूर मंडल पशु चिकित्सक केंद्राचे डॉ.श्री डांगे, टाकळीभान चे डॉ.शुभम निर्मळ यांना आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. तसेच यावेळी पशुपालकांनी दिलेली जर्सी गोऱ्हे शासनाच्या ताब्यात देण्यात आली. अनिल औताडे, भागवत शेळके, चंद्रकांत वमने, नंदू लहारे, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, प्रदीप काळे आदि पशुपालकांनी आपली अनुत्पादक जर्सी गोऱ्हे आंदोलनस्थळी आणून ग्राममहसूल अधिकारी यांच्या ताब्यात दिली. यावेळी माळेवाडी शाखेचे शाखा अध्यक्ष दिलीप औताडे, उपाध्यक्ष शैलेश वमने, दिलीप औताडे, माजी सरपंच रामभाऊ औताडे, हरिभाऊ ताके, महांकळ वाडगाव शाखेचे शाखाध्यक्ष कडू पाटील पवार, उपाध्यक्ष इंद्रभान चोरमल, गोरख औताडे ,नारायण पवार, मदन हाडके, राजेंद्र वमने, प्रवीण वमने, आयुब शेख, बाबासाहेब औताडे, गोकुळ कडू, गणेश रसाळ आदि शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष औताडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकी वेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी ‘सातबारा कोरा करू’असे आश्वासित करूनही आपली फसवणूक केली. आज राज्यात सरासरी दररोज सहा ते सात दुर्दैवी शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यकर्त्यांना या गोष्टीचे काहीच वाटत नाही. शेतकरी आत्महत्या ही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या उंबरठ्यावर पोहोचली असून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज हे सरकारचेच पाप आहे. या पापाचे परिमार्जन करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करावा व तसेच गोवंश हत्या बंदी कायद्यातून विदेशी भाकड जनावरे व जर्सी गोऱ्हे वगळून सुधारणा करणे सह वन्यप्राणी जीवा पासून शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे सदर कायदा ही तात्काळ रद्द करावा अन्यथा प्रशासनाच्या गाव पातळीवरील पोलीस चौकी, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात भाकड जनावरे सोडणार असल्याचा सज्जड इशारा जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांनी सरकारला दिला आहे.
