श्रीरामपूर-
शिर्डी येथील साई मंदिर परिसरात पोलिसांनी 12 अल्पवयीन मुलांची सुटका केली असून सदर मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यांच्या पालकांविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये बाल न्याय अधिनियम कलम 75, 76 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असून या पालकांवर अटकेची कारवाई देखील पोलिसांकडून करण्यात येणार आहे.गेल्या काही महिन्यातील शिर्डी शहराची पार्श्वभूमी बघता अशाच अल्पवयीन मुलांनी विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
संपूर्ण राज्यात पोलिसांनी पहिल्यांदाच अशा स्वरूपाची कारवाई केली आहे.शिर्डी शहरात अल्पवयीन मुले की जे शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे, हारतुरे विक्री करणे,फुलांची विक्री करणे,फोटो विक्री करणे इत्यादी बाबींमध्ये पालकांकडून अडकवली जातात.यातील बरीच मुले विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास देतात.अशा मुलांची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबवण्यात आली,अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
पोलिसांनी केलेलमध्ये कारवाईत एकूण बारा मुलांची सुटका करण्यात आली आहे.या बाराही मुलांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांना बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. बालकल्याण समितीकडून या बाराही मुलांची संगमनेर व श्रीरामपूर येथील आधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. केवळ अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांची रवानगी आधारगृहात
करण्याइतपतच ही मोहीम न थांबवता या मुलांना अशा प्रकारे दुर्लक्षित आयुष्य जगण्यास भाग पाडणाऱ्या, त्यांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस्त करणाऱ्या त्यांच्या पालकांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यातील शिर्डी शहराची पार्श्वभूमी बघता अशाच अल्पवयीन मुलांनी विविध गुन्हे केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शिर्डी शहरातील भाविकांची सुरक्षितता, भाविकांच्या शिर्डी शहरातील आगमन या ठिकाणचे वास्तव्य व त्यांचे निर्गमन हे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असल्याचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले आहे.
