श्रीरामपूर-नितीन शेळके
विदेशी जर्सी व होलस्टीन भाकड गाई–गोऱ्ह्यांच्या प्रश्नासह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय बुधवारी (दि. २१ ऑगस्ट) श्रीरामपूरात पेटला.अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे प्रांत कार्यालयावर धडक दिलेल्या आक्रोश मोर्चात “संपूर्ण कर्जमुक्ती करा, गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा ऍड. अजित काळे व जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी ऍड. अजित काळे म्हणाले की, गोवंश हत्या बंदी कायदा हा शेतकऱ्यांसाठी शाप ठरला आहे. हा कायदा केवळ धार्मिक आणि राजकीय हेतूंसाठी आणण्यात आला असून त्याचा परिणाम शेती आणि दूध व्यवसायावर गंभीर स्वरूपात झाला आहे. देशी गोवंशाचा सन्मान व संवर्धन करणे आवश्यक आहे; मात्र विदेशी भाकड जनावरांचा प्रश्न सोडवण्यासाठी कायद्यात सुधारणा करून त्यांना वगळणे अपरिहार्य आहे. “जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर हजारो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल आणि शेतकरी आत्महत्यांची मालिका थांबवणे कठीण जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
यात विदेशी जनावरे गोवंश हत्या बंदी कायद्याच्या कक्षेबाहेर काढावीत, देशी गोवंशावरच बंदी लागू रहावी, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करावा, भेसळयुक्त दुधावर बंदी आणावी, तसेच शेती साहित्याच्या वारंवार होणाऱ्या चोरीवर नियंत्रण ठेवावे अशा मागण्या करण्यात आल्या. “शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत असून ही परिस्थिती बदलली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही औताडे यांनी दिला.मोर्चादरम्यान संघटनेचे पदाधिकारी युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, सागर गिऱ्हे, संतोष पटारे, संजय वमने, शिवाजीराव पटारे आदींसह कुरेशी समाजाचे महेबुब कुरेशी, अंजुम शेख, मुजफ्फर शेख, एड. समिन बागवान, जोयेफ जमादार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही मोर्चेकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.शेवटी आंदोलनकर्त्यांनी आणलेली सुमारे ५० ते ५५ जर्सी व होलस्टीन गाई–गोऱ्हे थेट प्रांत कार्यालयाच्या दरवाज्याला बांधून “आता ही जनावरे आपणच सांभाळा” असा निर्वाणीचा पवित्रा घेतला. त्यानंतर प्रांताधिकारी सावंत यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व जनावरे ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली. आरोग्य विभागाने ती सेंट्रल गोडाऊन येथील कोंडवाड्यात हलवून पुढील प्रक्रिया सुरू केली.
