श्रीरामपूर-
बंटी जहागीरदार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागलेले आहेत.घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम बोलावून तपासला गती देण्यात आली आहे.काही व्हिडीओ फुटेज पोलिसांना तपासादरम्यान मिळाले असून त्यात आरोपी दिसत आहेत. त्यावरुन त्यांची ओळख पटवून शोध घेण्याचे काम सुरू आहे.अद्याप गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे निष्पन्न झाली नसली तरी त्यांना अटक केल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वस्थ बसणार नाही, तोपर्यंत सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केले आहे.
शहरातील कॉलेज रोड परिसरातील संतलुक हॉस्पिटल जवळ मंगळवार दि.31 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.जहागिरदार यांना छाती व पोटात गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत असल्याने श्रीरामपूर शहरात त्यांचे समर्थक चिंतेत आहेत.त्या पार्श्वभूमीवर भवर यांनी हे आवाहन केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर पुढे म्हणाले की, पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुन्ह्यातील पुरावे गोळा केले.यातील तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.यात स्थानिक गुन्हे शाखेची देखील मदत घेतली जात आहे.आरोपींनी गोळीबार करताना पिस्टल वापर केलेला दिसत आहे.तपास पथकाकडून सर्व पुरावे बारकाईने गोळा करून तपासले जात आहेत जेणे करून भविष्यात देखील या गुन्ह्याच्या तपासात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली जात आहे.त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करून शांतता अबाधित ठेऊन कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी,असे आवाहन पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी केले आहे.
