श्रीरामपूर-
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरचा बिहार करण्याचे काम चालवले आहे.शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत.त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे.माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असून नगरपालिका निवडणूकित विखे पाटील यांनी प्रचंड प्रमाणात दहशतीचा वापर सुरू केला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी केला आहे.
श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश चित्ते बोलत होते. चित्ते पुढे म्हणाले की,शहरातील गुन्हेगारी विखे पाटील यांच्यामुळेच वाढली. त्यांनीच गुंडांना पोसले.पालकमंत्री तेच आहेत.आताही निवडणूक काळात सुनील मुथा व शामलिंग शिंदे यांच्यावर त्यांनी गुन्हे दाखल करायला लावले.तसेच सेनेच्या प्रभाग 17 मधील उमेदवारालाही पोलिसांच्या दडपणाखाली माघार घेण्यास भाग पाडले.या सर्व जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांच्या करामती असल्याचा आरोपही चित्ते यांनी केला.ते पुढे म्हणाले की,श्रीरामपूर जिल्हा विखे यांनीच होऊ दिला नाही.शहरातील 2 हजार लोकांचा प्रपंच अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली विखे पा. यांनी उध्वस्त केला.ते फक्त व्यक्ती द्वेष करतात.मी त्यांच्यासाठी घातक आहे.समाजासाठी नाही.या निवडणुकीत भाजपचे पॅनल सुद्धा होऊ शकत नव्हते. त्यांचे पॅनल हे आमच्या संघटनेचे कर्तृत्व आहे. शहरातली भाजप ही खरी भाजप नसून ती विखे यांची काँग्रेस आहे.
स्व.जयंत ससाणे यांच्याबरोबर असलेलेच आज भाजपकडून उमेदवार म्हणून उभे आहेत.ही सर्व तीच जुनी रेबन गॅंग आहे.त्यांना तेव्हाही शहरातील जनतेचा विरोध होता व तो आताही आहे.त्यामुळे आताची भाजप ही काँग्रेसचीच बी टीम असल्याचेही चित्ते यांनी म्हटले.विखे यांना काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांना नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या अनुराधा आदिक यांना उपनगराध्यक्ष करायचे आहे.त्यांना भाजपचे काहीही घेणेदेणे नाही.त्यांना आपली विखे संघटना महत्वाची आहे.त्यांची संघटना ही बांडगुळांची संघटना आहे.ती ठेकेदारी करणारांची टोळी असल्याचे चित्ते म्हणाले.मी 40 वर्षे भाजपचे काम करत आलो. परंतु भाजपने माझ्या कामाचे मूल्यमापन केले नाही.ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आणि मला न्याय दिला.निवडणूक प्रचार संदर्भात दि.24 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शहरात रॅली व छोटी सभा होणार असल्याचेही चित्ते यांनी सांगितले.
आदिकांना तेव्हा मी कसा चाललो?
राष्ट्रवादीच्या अविनाश आदिक यांनाही मी श्रीरामपूर करता घातक वाटत असेल तर मग मागील निवडणूकीच्या वेळी आपल्या बहिणीसाठी अनुराधा आदिक यांच्यासाठी माझ्याकडे पाठिंबा त्यांनी का मागितला?त्यावेळी मी त्यांना का चाललो?असे प्रश्नही चित्ते यांनी उपस्थित केले.
