श्रीरामपूर-
श्रीरामपूर-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील चेंडूफळ (ता. वैजापूर) गावात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिकाचे तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.या शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.भारत भागवत पवार, अभय लक्ष्मीकांत पवार, राजेंद्र विजय पवार अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.या शेतकऱ्यांच्या शेतात महावितरणचे वीजवाहक पोल असून त्यावरील तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय,वैजापूर यांच्याकडे याबाबत वेळोवेळी तक्रार देखील केली होती असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.महावितरणकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली नसल्याचाही या शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे ऊस जळीताची ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान अगोदरच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असतानाच त्यात या ऊस पिकाच्या जळीताच्या घटनेने या शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी मदतीसाठी अग्निशामक वाहनासही बोलवले होते परंतु वैजापूर तालुक्यापासून 45 किलोमीटर अंतर असल्यामुळे ती मदतही वेळेत होऊ शकली नाही.ऊस पिकाचे जळीत होऊन झालेल्या नुकसानीला महावीतरणाचा भोंगळ कारभार जबाबदार असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
