श्रीरामपूर-
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जडवाहनांची वाहतूक त्वरित वळविण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या संदर्भातआदेश जारी केले आहेत. त्यानुसार आज दि. १२ सप्टेंबर पासून जडवाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
नगर-मनमाड महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.देशभरातून लाखो भाविक या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावरील खड्डे, दुरावस्था, वारंवार होणारे अपघात आणि वाढत्या जडवाहनांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.गेल्या काही दिवसांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत स्वतः हस्तक्षेप करून संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, रस्त्याचे काम वेगाने पूर्ण व्हावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत जड वाहतूक या मार्गावरून बंद करून वळविण्यात यावी.आज दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी वाहतूक वळविण्या बाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.त्यानुसार ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.तसेच येत्या काही दिवसांत नगर-मनमाड मार्गाचे दुरुस्तीचे कामही जलदगतीने पूर्ण केले जाणार आहे.
